अवघ्या चार मिनिटांत उद्घाटन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या हट्टासाठी लाखोंचा खर्च पाण्यात

महाराष्ट्र टाइम्स

CM for Inauguration:पुणे शहरात आचार्य आनंदऋषीजी चौकात दुहेरी उड्डाणपुलाच्या पहिल्या मार्गिकेचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी मोठा खर्च करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूल उभारला, पण उद्घाटनामुळे नागरिकांचा वेळ वाया गेला.

CM for Inauguration of Flyover in Pune
म.टा. प्रतिनिधी, पुणे : वाहतूक कोंडीतून पुणेकरांची मुक्तता व्हावी, या उद्देशाने आचार्य आनंदऋषीजी चौकात दुहेरी उड्डाणपूल उभारण्यासाठी पाच वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना बुधवारी केवळ उद्घाटनाचा सोस कसा असतो, ते पाहायला मिळाले. सायंकाळी ७.०१ मिनिटांनी उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले अन् अवघ्या चार मिनिटांत, ७.०५ वाजता ते रवाना झाले.

या उद्घाटनासाठी पुलावर कार्यक्रमाच्या ठिकाणी रेड कार्पेट, फुलांच्या माळा-मंडप यासाठी खर्च केला गेला; तसेच नेतेमंडळींच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवून कोंडीत भर टाकण्यात आली. नंतरही पूल वाहतुकीसाठी लगेच खुला केला गेला नाही. त्यामुळे पुणेकर, वाहनचालकांच्या सुविधेसाठी तयार केल्या जाणाऱ्या या पुलावर नागरिकांच्या करातून मिळणाऱ्या निधीतून २७७ कोटी खर्च झाले; पण केवळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनाच्या हट्टासाठी पुणेकरांचा वेळ आणि खर्च झालेल्या इंधनाचे मोलच करता येणार नाही.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) विद्यापीठ चौकात प्रस्तावित केलेल्या दुमजली उड्डाणपुलाची पहिली मार्गिका (औंध ते शिवाजीनगर) अशा एका बाजूचा लोकार्पण सोहळा बुधवारी झाला. पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आदी या वेळी उपस्थित होते.

विद्यापीठ चौकात दररोज सायंकाळी वाहनधारकांची गर्दी होते; तरीही लोकार्पण पुलावरच आयोजित केले होते. केवळ चार मिनिटांच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपयांचा खर्च कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कार्यकर्त्यांंमध्ये घोषणाबाजी

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ आणि ‘महाराष्ट्राचा एकच भाऊ, देवा भाऊ देवा भाऊ’ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर तेथेच उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजित दादा’ अशी घोषणा द्यायला सुरुवात केली. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे झेंडे फडकवायला सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले.