‘धर्माच्या वाटचालीनेच देश विश्वगुरू’

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत सांगितले की, भारताचा धर्म हाच त्याला विश्वगुरू बनवेल. हा धर्म केवळ पंथ नसून सृष्टीला दिशा देणारे तत्त्व आहे. हजारो वर्षांपासून संतांनी हा धर्म जपला आहे. आता भारत हा धर्म जगाला देईल. जोपर्यंत भारत धर्माच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करेल, तोपर्यंत तो विश्वगुरू राहील.

‘धर्माच्या वाटचालीनेच देश विश्वगुरू’
मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, जोपर्यंत भारत धर्म ाच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करेल, तोपर्यंत तो विश्वगुरू म्हणून ओळखला जाईल. कारण भारताकडे असलेली आध्यात्मिक दृष्टी आणि ज्ञान जगात इतरत्र कुठेही नाही. धर्म म्हणजे केवळ पंथ किंवा पूजा पद्धती नसून, ते सृष्टीला दिशा देणारे तत्त्व आहे. हजारो वर्षांपासून भारतीय संतांनी हा धर्म जपला आहे आणि आता भारत हा धर्म जगाला देईल, असेही ते म्हणाले. घाटकोपर पूर्व येथील भानुशाली वाडी येथे ‘विहार सेवा ऊर्जा मिलन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

भागवत यांनी स्पष्ट केले की, आपल्याला सर्वांना चालवणारे एकच तत्त्व आहे आणि ते म्हणजे धर्म. हा धर्म संपूर्ण विश्वाचा चालक आहे आणि सर्व काही याच तत्त्वावर चालते. भारताला आपल्या पूर्वजांकडून एक समृद्ध आध्यात्मिक वारसा मिळाला आहे आणि आजही आपल्याला संत-महात्म्यांकडून मार्गदर्शन मिळत आहे. जोपर्यंत धर्म भारताला चालना देत राहील आणि आपला देश त्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत राहील, तोपर्यंत भारत विश्वगुरू राहील. कारण जगातील इतर देशांकडे असे ज्ञान नाही आणि तिथे अध्यात्माची कमतरता आहे. हे आपल्या पूर्वजांचे अमूल्य वैभव आहे, असेही भागवत यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, मी असो, तुम्ही असो किंवा कुणीही असो, आपल्याला चालवणारी शक्ती एकच आहे. जर वाहन त्या शक्तीने चालवले गेले, तर अपघात कधीच होणार नाही. तो चालक म्हणजे धर्म. सृष्टी निर्माण झाली तेव्हाच तिच्या कार्यपद्धतीचे नियम अस्तित्वात आले आणि तेच धर्म आहेत. धर्म हा केवळ धर्मसंस्थांपुरता मर्यादित नाही, तर निसर्गातील प्रत्येक घटकाचा स्वतःचा धर्म आहे. उदाहरणार्थ, पाण्याचा धर्म वाहणे आहे, तर अग्नीचा धर्म जळणे आहे. पुत्राचा धर्म, राज्यकर्त्याचा धर्म, आचारसंहिता... हे सर्व धर्माचेच रूप आहे. आपल्या पूर्वजांनी मोठ्या तपश्चर्येतून आणि आध्यात्मिक संशोधनातून हे नियम ओळखले. झोपडीत राहणारा एखादा माणूस भाषण करत नसला तरी धर्म त्याच्या रक्तात वाहत असतो, असे भागवत यांनी सांगितले.

भागवत यांनी हे देखील स्पष्ट केले की, हे सर्व ईश्वराचे काम आहे, हे मान्य करणे सोपे आहे, पण आचरणात आणणे कठीण आहे. शरीर ही त्याची कार्यशाळा आहे आणि आपण फक्त काम करणारे आहोत. मालक तोच आहे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणलेली सत्याची वाट आहे. हे सांगतानाच त्यांनी गर्वापासून मुक्त होण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.