महिलादिनी देशातील २५० जिल्ह्यांत ‘अस्मिता लीग’

महाराष्ट्र टाइम्स

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी देशभरात २५० ठिकाणी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा होणार आहेत. 'अस्मिता' कार्यक्रमांतर्गत या स्पर्धा युवक व क्रीडा मंत्रालयाद्वारे आयोजित केल्या जात आहेत. १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा तीन गटांत १००, २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यती होतील. सुमारे २ लाख ५० हजार महिला यात सहभागी होतील.

महिलादिनी देशातील २५० जिल्ह्यांत ‘अस्मिता लीग’
महिला दिनानिमित्त, ८ मार्च रोजी देशभरात २५० ठिकाणी 'अस्मिता' लीग अंतर्गत धावण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. युवक व क्रीडा मंत्रालयाच्या या उपक्रमातून महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, तसेच भविष्यात राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्पर्धांच्या आयोजनाची तयारी करणे हा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ही घोषणा केली असून, या लीगमध्ये सुमारे २ लाख ५० हजार महिला सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या विशेष ' अस्मिता लीग 'मध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धा १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा तीन वयोगटांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. महिला दिनाच्या निमित्ताने एकाच दिवसात देशभरातील २५० ठिकाणी या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. हा उपक्रम केंद्र शासनाच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या 'अस्मिता' कार्यक्रमांतर्गत राबवला जात आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.
दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खडसे यांनी सांगितले की, महिला दिनानिमित्त देशभरात २५० ठिकाणी होणारी 'अस्मिता' स्पर्धा देशभरातील तरुणींना एकत्र आणण्याची एक मोठी संधी आहे. 'अस्मिता' हे व्यासपीठ देशभरात लोकप्रिय होत असून, या माध्यमातून महिलांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. हे व्यासपीठ 'खेलो इंडिया' मोहिमेचाच एक भाग आहे. महिलांसाठी लीग आणि स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील क्रीडागुणांना वाव देणे हा यामागील उद्देश आहे.

२०२१ पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३४ क्रीडा प्रकारांमध्ये २,६०० पेक्षा अधिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा देशभरातील ५५० हून अधिक जिल्हे आणि ७०० शहरांमध्ये पार पडल्या असून, तीन लाखांहून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला आहे. ही स्पर्धा ३० हून अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्य व जिल्हा क्रीडा संघटना, खेलो इंडिया केंद्रे आणि इतर संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने आयोजित केली जाईल. विशेषतः गावातील आणि लहान शहरांतील मुलींनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करावे, हा या लीगमागील मुख्य उद्देश असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.

याव्यतिरिक्त, भारत २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी जिल्हास्तरापासूनच विशेष तयारी करणे आवश्यक आहे. महिला दिनानिमित्ताचा हा 'अस्मिता' उपक्रम त्या तयारीचाच एक भाग असल्याचेही खडसे यांनी अधोरेखित केले.