जावेद अख्तर यांच्यामुळे मुशायरा पुढे ढकलला; मुस्लिम संघटनांच्या दबावामुळे पश्चिम बंगाल सरकार झुकले

महाराष्ट्र टाइम्स

Javed Akhtar: पश्चिम बंगाल सरकारने जावेद अख्तर यांचा सहभाग असलेला मुशायरा पुढे ढकलला आहे. मुस्लिम संघटनांनी जावेद अख्तर यांच्या इस्लामविरोधी वक्तव्यांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या उर्दू अकादमीने हा निर्णय घेतला. अकादमीने मुशायरा पुढे ढकलण्याचे कारण स्पष्ट केले नाही.

Javed Akhtar's Mushaira Postponed
वृत्तसंस्था, कोलकाता: ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांचा सहभाग असलेला मुशायरा काही मुस्लिम संघटनांच्या दबावामुळे पुढे ढकलण्याची नामुष्की प. बंगाल सरकारवर ओढवली आहे. राज्य सरकारच्या उर्दू अकादमीतर्फे येथे एक ते चार सप्टेंबर या कालावधीत हा मुशायरा आयोजित करण्यात आला होता. मात्र, ‘जावेद यांनी यापूर्वी इस्लामविरोधी शेरेबाजी केली असल्याचा’, आरोप करत या संघटनांनी त्यांच्या सहभागावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. अखेर आयोजकांना या संघटनांच्या विरोधापुढे झुकावे लागले. मात्र, हा मुशायरा पुढे ढकलण्याचे कारण अकादमीतर्फे देण्यात आले नाही.

ही अकादमी राज्य सरकार संचालित आहे. ‘काही अपरिहार्य कारणांमुळे हा चारदिवसीय मुशायरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्याचे नवे वेळापत्रक नंतर घोषित करण्यात येईल’, असे या अकादमीचे सचिव नुझहत झैनाब यांनी मंगळवारी सांगितले. नंतर होणाऱ्या मुशायरामध्ये जावेद अख्तर यांची उपस्थिती असेल की नाही, याविषयी मात्र त्यांनी माहिती दिली नाही. जमियत-ए-उलेमा या मुस्लिम संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मुफ्ती अब्दुस सलाम काझमी यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली. ‘जावेद अख्तर यांनी अलीकडेच काही इस्लामविरोधी शेरेबाजी केली होती. त्यांच्या त्या वक्तव्यांमुळे मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. अल्पसंख्याक संस्था असल्याने या अकादमीने मुस्लिमांच्या भावना न दुखावणाऱ्या एखाद्या कलाकारास आमंत्रित करायला हवे’, असे आम्हाला वाटते, असे ते म्हणाले.
‘ही अकादमी मुस्लिम धर्माच्या मूल्यांची जपणूक करत असल्याने सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने कलाकारांची निवड करताना अतिशय काळजी घ्यायला हवी’, अशी प्रतिक्रिया वाह्येन फाउंडेशनचे मुफ्ती शामैल नदवी यांनी दिली.