‘सुरक्षा आव्हानांसाठी सज्जता गरजेची’, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे प्रतिपादन

महाराष्ट्र टाइम्स

Rajnath Singh: महू येथे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आर्मी वॉर कॉलेजमधील 'रण संवाद' मध्ये सैनिकांना मार्गदर्शन केले. भारताला कोणाचीही जमीन नको, पण संरक्षणासाठी सज्ज राहा, असे ते म्हणाले. सध्याची युद्धे अनिश्चित आहेत, त्यामुळे तयारी महत्त्वाची आहे. सायबर युद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञान युद्धांना नवीन दिशा देतील.

rajnath singh emphasizes importance of preparedness for indias security in army war college
वृत्तसंस्था, महू: सशस्त्र दलांनी अल्पकालीन संघर्षांपासून ते दीर्घकालीन युद्धापर्यंतच्या सर्व प्रकारच्या सुरक्षा आव्हानांसाठी सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी येथे केले. आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित ‘रण संवाद’ या विशेष चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

सैन्यदल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख ए. पी. सिंह आणि नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.
राजनाथसिंह म्हणाले, ‘ भारत ाला कोणाचीही जमीन नको आहे; पण आपल्या प्रादेशिक अखंडतेच्या रक्षणासाठी भारत कोणत्याही संघर्षासाठी तयार आहे. आजच्या युगात युद्धे इतकी अचानक आणि अनपेक्षित झाली आहेत, की कोणतेही युद्ध कधी संपेल आणि किती काळ चालेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. राष्ट्रीय सुरक्षा लष्कराचा विषय राहिलेला नसून, तो राष्ट्राच्या दृष्टिकोनाचा मुद्दा बनला आहे.’

सायबर युद्ध, ड्रोन आता महत्वाचे

सायबर युद्ध, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि उपग्रहावर आधारित टेहळणी या बाबी भविष्यातील युद्धांना आकार देतील. त्यामुळेच सैनिकांची प्रचंड संख्या किंवा शस्त्रसाठ्याचे प्रमाण आता पुरेसा राहिलेला नाही. अचूक-मार्गदर्शित शस्त्रे, सज्ज गुप्तचर यंत्रणा आणि डेटा-आधारित माहिती आता कोणत्याही संघर्षात यशाचा पाया बनली आहे, असे सिंह यांनी स्पष्ट केले. ‘आर्मी वॉर कॉलेज’मध्ये चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांचा वेध घेतला.