पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला एआय क्षेत्रात जगात अव्वल स्थान मिळवण्याचे आवाहन केले आहे. भारत केवळ एआय वापरणारा नाही, तर निर्माण करणारा देश बनेल. भारतीय एआय मॉडेल्स जगभर वापरले जातील. स्टार्टअप्सना मोठी झेप मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. एआय मानवकेंद्रित असावा, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' हे एआय परिषदेचे ब्रीदवाक्य आहे.
भारताला जागतिक स्तरावर एआय ( Artificial Intelligence ) क्षेत्रात अव्वल तीन महासत्तांमध्ये स्थान मिळवायचे आहे. केवळ एआयचा वापर करणारा देश न राहता, एआय निर्माण करणारा देश बनण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या 'एआय समिट'च्या पार्श्वभूमीवर 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विचार मांडले. भारतीय एआय मॉडेल्स जगभर वापरली जावीत, भारतीय स्टार्टअप्सनी अब्जावधी डॉलर्सचे मूल्यांकन गाठावे आणि कोट्यवधी उच्च दर्जाच्या नोकऱ्या निर्माण व्हाव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे. एआयने जागतिक विकासाला गती द्यावी, पण तो मानवकेंद्रितच राहावा, यावर त्यांनी भर दिला.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, तंत्रज्ञानाचा केवळ उपभोग न घेता ते निर्माण करणे, हा 'आत्मनिर्भर भारता'चा मूळ सिद्धांत आहे. एआयच्या बाबतीत त्यांची दृष्टी सार्वभौमत्व, सर्वसमावेशकता आणि नवोन्मेष या तीन स्तंभांवर आधारित आहे. प्रत्येक भारतीयाला एआय हा संधी निर्माण करणारा, क्षमता वाढवणारा आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर करणारा साधन म्हणून अनुभवायला मिळावा, धोक्याचा किंवा नियंत्रणाचा साधन म्हणून नव्हे, असे ते म्हणाले. 'आत्मनिर्भर भारतातील एआय' म्हणजे डिजिटल युगासाठी भारताने स्वतःचा कोड लिहिणे. 'इंडिया एआय मिशन'द्वारे हा कोड भारताच्या मूल्यांशी सुसंगत राहील, लोकांची सेवा करेल आणि जगासाठी जबाबदार एआय नेतृत्व प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.'एआय' परिषदेचे ब्रीदवाक्य 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' आहे. हे ब्रीदवाक्य देण्यामागे पंतप्रधानांनी सांगितले की, आज एआय नागरीकरणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. तो मानवी क्षमतांचा अभूतपूर्व विस्तार करू शकतो, पण योग्य मार्गदर्शन नसेल तर सामाजिक रचनेलाही आव्हान देऊ शकतो. 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' ही भारताच्या सांस्कृतिक तत्त्वज्ञानाची अभिव्यक्ती आहे. तंत्रज्ञानाचे अंतिम ध्येय 'सर्वांचे कल्याण आणि सर्वांचा आनंद' हेच असले पाहिजे. तंत्रज्ञान मानवतेची सेवा करण्यासाठी आहे, तिची जागा घेण्यासाठी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
एआयमधील पूर्वग्रह आणि मर्यादा या चिंतेच्या विषयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लिंग, भाषा आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी यांवर आधारित पूर्वग्रह एआय प्रणालीमध्ये नकळत येऊ शकतात. भारताच्या भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे ही समस्या अधिक गुंतागुंतीची होते. त्यामुळे विविधता प्रतिबिंबित करणारे डेटासेट तयार करणे, प्रादेशिक भाषांमध्ये एआय विकसित करणे आणि निष्पक्षतेवर संशोधन वाढवणे यावर भर दिला जात आहे.
डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि एआय यांचे एकत्रीकरण सार्वजनिक सेवा वितरणात कशी मदत करू शकते, या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले की, आधार, यूपीआयसारखी डिजिटल पायाभूत सुविधा सार्वजनिक हितासाठी उभी केली गेली आहे. ती खुली आणि परस्परसंवादी आहे. एआय या पायावर जोडल्यास कल्याणकारी योजना अधिक अचूकपणे राबवता येतील, फसवणूक रोखता येईल आणि प्रशासन अधिक पारदर्शक होईल. एआयमुळे रोजगारांवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यावर मात करण्यासाठी तयारी हाच सर्वोत्तम उपाय आहे, असे त्यांनी सांगितले.