महाराष्ट्रातील मध्ययुगीन काळाच्या पाऊलखुणा शब्दस्वरांतून, लयींतून आणि नृत्य, नाट्य, गीतांचा आविष्कार असलेल्या ‘ आनंद भैरवी ’तून प्रभावीपणे साकार झाल्या. रसिकांनी या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘कलासंगम’ महोत्सवात ‘आनंद भैरवी’ हा कार्यक्रम शुक्रवारी रंगला. मध्ययुगीन मराठी काव्याचा बाराव्या ते सतराव्या शतकापर्यंतचा प्रवास नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचनाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला. या कार्यक्रमाची संहितालेखन व दिग्दर्शन डॉ. वर्षा तोडमल यांचे होते. तोडमल यांचे अभिवाचन आणि दिशा उपाध्ये, विश्वराज नाईक, ध्रुव माताळे, आदित्य गवळी आणि सिद्धी खरे या कलाकारांनी संगीत, नृत्य व नाट्यरूप सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीतावर सादर झालेल्या नृत्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
भक्ती, करुणा आणि लोकशक्तीचा प्रत्येक युगाचा स्वतःचा एक स्वर असतो. मध्ययुगीन महाराष्ट्राचा स्वर हा भक्तीचा, करुणेचा आणि लोकशक्तीचा होता. अभंगातून उमललेली भक्ती, विरहवेदना, पोवाड्यांतून दुमदुमलेला पराक्रम, शाहिरी वाङ्मयातून प्रकटलेली लोकजागृती आणि लावणीच्या लयीतील जीवनोत्सव अशा सर्व प्रवाहांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांचे मन प्रसन्न झाले. प्राचीन मराठी साहित्याचा समृद्ध पट दिशा आणि विश्वराज यांनी समर्थ अभिवाचनातून उलगडला. सुरावटींच्या संगतीने ‘आनंद भैरवी’चा गंध रसिकांच्या मनात दरवळला. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘मुंगी उडाली आकाशी’, ‘घागर घेऊन निघाली पानगवळण’, ‘सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो’ अशा एकापेक्षा एक गीतांच्या सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकली.
मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास मराठीचे अस्तित्व सातव्या शतकात शब्दरूपाने, अकराव्या शतकात शिलालेखांमधून वाक्यरूपाने, तर बाराव्या शतकात ग्रंथरूपाने दिसून येते. तेराव्या शतकातील संत ज्ञानदेवांपासून ते सतराव्या शतकातील संत तुकाराम व समर्थ रामदासांपर्यंत संतपरंपरेने भक्तिचा अखंड ओघ आपल्या काव्यातून जिवंत ठेवला. संतकाव्य, पंतकाव्य आणि तंतकाव्य असे तीन प्रमुख प्रवाह प्राचीन मराठी कवितेत दिसून येतात. त्याचबरोबर पोवाडे , लावण्या, भेदिक कवने आदींचा समावेश असलेले शाहिरी वाङ्मय हा स्वतंत्र आणि लोकाभिमुख काव्यप्रकार सादर करण्यात आला. मध्ययुगीन काव्य हा केवळ इतिहासाचा भाग नसून, तो आपल्या संस्कृतीचा श्वास आहे, ही जाणीव आनंद भैरवीतून अधोरेखित झाली. ‘अगा वैकुंठीच्या राया’ने आनंद भैरवीची सांगता झाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. मुख्य उपसंपादक श्रद्धा सिदीड यांनी सूत्रसंचालन केले.






