पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या भागांना लवकरच स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी आंद्रा धरणातून अधिक प्रवाहाने पाणी सोडण्याचे; तसेच इंद्रायणी नदी पात्रातील निघोजे बंधारा तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराला मावळ परिसरातील पवना धरण आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंद्रा धरणातून सोडण्यात येणारे पाणी निघोजे बंधाऱ्यामार्गे इंद्रायणी नदीतून उचलून चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून समाविष्ट भागातील नागरिकांना वितरित केले जाते. मात्र, मोशी, चिखली, चऱ्होली, चोविसावाडी, डुडुळगाव आणि बोऱ्हाडेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याची बाब आमदार महेश लांडगे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केली. या संदर्भात आमदार लांडगे यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली. त्यानंतर मंत्र्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन आंद्रा धरणातून अधिक प्रवाहाने पाणी सोडण्याचे व निघोजे बंधारा त्वरित स्वच्छ करण्याचे आदेश दिले. तालिका अध्यक्ष समाधान अवताडे यांनीही तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.






