डोंबिवली पूर्व येथील पी अँड टी कॉलनी परिसरातील शेकडो रहिवाशांनी गुरुवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला. तर कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने एमआयडीसीकडून कमी दाबाने होत असलेल्या पाणी पुरवठ्याकडे बोट दाखवत या नागरिकांची बोळवण केली.
शहराच्या अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. कधी नदीतील पाण्याची पातळी घटल्याचे तर कधी एमआयडीसी- कडून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याचे कारण देत नागरिकांना वेठीस धरले जात आहे.
डोंबिवली पूर्व येथील पी अँड टी कॉलनी परिसरात निवडणुकीच्या काळात पूर्ण क्षमतेने होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. दिवसभर कामासाठी घराबाहेर असणाऱ्या नागरिकांना घोटभर पाण्यासाठी रात्र जागवावी लागत आहे. तरीही पाणी मिळत नसल्याने प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर या भागासाठी प्रशासनाकडून टँकर उपलब्ध करून दिले जातात. मात्र गंज चढलेल्या टँकरच्या पाण्याने नागरिक, मुले आजारी पडत आहेत. यामुळे आपल्याला टँकरचे नव्हे तर हक्काचे नळाचे पाणी द्या, अशी मागणी करत बुधवारी पी अँड टी कॉलनीमधील नागरिकांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला जाब विचारला.






