वेरूळ येथील संत जनार्दन स्वामी आश्रमातून कुटियाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागून ट्रकमधील साहित्य जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचला घडली. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याविषयी अधिक माहिती अशी : नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पंचमुखी बालाजी मंदिरात २० तारखेपासून सुरू होणाऱ्या यज्ञासाठी कुटियाचे साहित्य घेऊन हा ट्रक निघाला होता.
मात्र, ट्रकचा धक्का आश्रमातून जाणाऱ्या विद्युतवाहिनीला लागल्याने विजेच्या ठिणग्या पडल्याने ट्रकमधील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. साहित्याचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती सुनील हेमाराम (रा. नागोर, ता. परबतसर-राजस्थान) यांनी दिली.






