‘ उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा मी आजारपणामुळे दिलाच नव्हता’, असा दावा या पदावरून रातोरात पायउतार झालेले जगदीप धनखड यांनी नुकताच केला आहे. धनखड यांच्या तडकाफडकी राजीनाम्याबाबत राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले होते.
आपण राजीनामा देण्याचे पाऊल प्रकृती अस्वास्थ्यामुळे उचलले नव्हते, असे सांगताना धनखड यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रपतींना पाठविलेल्या स्वतःच्याच राजीनामापत्रातील दावाही एकप्रकारे खोडून काढला आहे. संसदेच्या मागील पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे २१ जुलै २०२५ रोजी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात धनखड यांनी लिहिले होते की, आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी आपण पदाचा राजीनामा देत आहे.
राजीनामा दिल्यावर धनखड यांनी अज्ञातवास व मौन बाळगले होते, ते त्यांनी प्रथमच सोडले आहे.






