भिवंडीतील कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

महाराष्ट्र टाइम्स

भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावातील कोयना प्रकल्पग्रस्त कुटुंबे ६५ वर्षांपासून सुविधांपासून वंचित आहेत. गावठाण आणि महसुली दर्जा नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. महसूलमंत्र्यांच्या दालनात यावर बैठक होणार आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.

koyana project affected still facing hardship new issues arise in bhiwandi
सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या ८० हून अधिक कुटुंबांचे भिवंडी तालुक्यातील करंजवडे गावात पुनर्वसन झाले. मात्र, गावठाण आणि महसुली दर्जा नसल्यामुळे ही कुटुंबे गेल्या ६५ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या हक्कांसाठी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

करंजवडे गाव चार एकर जागेवर वसलेले आहे. नियमानुसार, किमान सात एकर जागा असलेल्या गावाला महसुली दर्जा मिळतो. त्यामुळे ग्रामस्थांनी आणखी तीन एकर जमीन मिळवण्याची मागणी केली आहे. महसुली आणि गावठाण दर्जा नसल्यामुळे या गावाला सरकारी योजना आणि इतर सोयीसुविधांचा लाभ मिळत नाही. इतर गावांमध्ये विकासकामे होत असताना, ही प्रकल्पग्रस्त वस्ती मात्र त्यापासून दूर आहे.
या अन्यायाविरोधात ग्रामस्थांनी आमदार संजय केळकर यांची 'जनसेवकाचा जनसंवाद' या कार्यक्रमात भेट घेतली. यावर आमदार केळकर यांनी महसूलमंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.