अवजड वाहतूकबंदी कागदावरच; गोवा वाहतूक मार्गावर वर्दळ सुरू, पोलिसांचा मात्र काणाडोळा

महाराष्ट्र टाइम्स

Heavy Vehicles Ban: गणेशोत्सवासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना घातलेली बंदी झुगारली जात आहे. वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याने, अनेक मोठ्या कंपन्यांची वाहने सर्रासपणे महामार्गावर धावत आहेत. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Heavy vehicles traffic continue even after ban
म.टा. वृत्तसेवा, अलिबाग: गणेशोत्सवाच्या कालावधीत गणेशभक्तांचा कोकणातील गावाचा प्रवास सुरळीत व्हावा, यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून २३ ऑगस्टपासून गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली. मात्र दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनानंतर महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ सर्रास सुरू असून, वाहतूक पोलिसही याकडे काणाडोळा करत आहेत.

रायगड जिल्ह्यात २७ ऑगस्टपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना २३ ऑगस्टपासूनच बंदी घालण्यात आली आहे. २९ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंत, २ सप्टेंबर सकाळी ८ वाजल्यापासून ४ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत, तसेच ६ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून ते ८ सप्टेंबरला रात्री ८ वाजेपर्यंत हा बंदी आदेश राहणार आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारून मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे. वाहतूक पोलिसही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.
या अवजड वाहनांमध्ये रायगड जिल्ह्यातील बड्या कंपनीच्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे हा बंदी आदेश रायगड जिल्ह्यातील या बड्या कंपन्यांना लागू नाही का, असा प्रश्न गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना पडला आहे. महामार्गावर विशिष्ट ठिकाणी पाहणी, तसेच गस्तही सुरू असल्याचा दावा सरकारी यंत्रणा करतात. मात्र त्यांच्या नजरेतून ही अवजड वाहने सुटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

याआधीच्या वर्षी वाहतूकबंदी आदेशाची पुरेपूर अंमलबजावणी केली जात होती. अवजड वाहतूकबंदीविरोधात संबंधित कंपनीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने त्याला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांवरील बंदी कायम राहिली होती. मात्र यावर्षी जिल्हा प्रशासनाचा आदेश धाब्यावर बसवण्यात आल्याचे चित्र आहे.