जिल्ह्यात बाराशेहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांच्या विभाजनाचे काम हाती घेण्यात आले असून, एका मतदान केंद्रात जास्तीत जास्त १,२०० मतदारांचीच नावे राहतील, याची खबरदारी घेण्यात येते आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने १ हजार ६५० मतदान केंद्रे वाढणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकृत सूत्रांनी दिली.
देशात मतदार याद्यांमधील त्रुटींबाबत तक्रारींचा ओघ कायम आहे. सदोष मतदार याद्यांबाबत विरोधक निवडणूक आयोगाला लक्ष्य करीत आहेत. या पार्श्वभूमीवर सन २००२ च्या मतदार याद्यांच्या आधारावर देशात विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. परंतु राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ही विशेष मोहीम लांबणीवर पडली आहे. परंतु, आयोगाने मतदान केंद्राच्या सुसूत्रीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असून, जिल्हा निवडणूक शाखेने १५ विधानसभा मतदारसंघात हे काम हाती घेतले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४ हजार ९०० मतदान केंद्रे आहेत. बाराशेहून अधिक मतदार असणाऱ्या केंद्राची विभागणी करण्यात येते आहे. प्रस्तावित विभागणीनुसार जिल्ह्यात नव्याने १ हजार ६५० मतदान केंद्रे वाढणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या ६ हजार ५५० वर पोहोचली आहे.
विधानसभानिहाय वाढीव केंद्रे
नांदगाव ९१, मालेगाव मध्य ७८,
मालेगाव बाह्य १३५, बागलाण ९१, कळवण ४७, चांदवड ९२, येवला ८८, सिन्नर ७३, निफाड १११ दिंडोरी ६६, नाशिक पूर्व २३९, नाशिक मध्य १५७, नाशिक पश् चिम २३८, देवळाली ८९, इगतपुरी ५५.







