जड वाहनांसाठी ‘ॲडास’ बंधनकारक

Contributed byसंचालक|महाराष्ट्र टाइम्स

सन २०२७ पासून जड वाहनांमध्ये ॲडास तंत्रज्ञान बंधनकारक होणार आहे. यामुळे रस्ते अपघात कमी होण्यास मदत मिळेल. ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ड्रायव्हर ड्राउझीनेस डिटेक्शन यांसारखी पाच वैशिष्ट्ये अनिवार्य असतील. इतर वाहनांसाठीही हे तंत्रज्ञान लागू करण्याचा प्रस्ताव आहे. पुणे जिल्ह्यातील टाकवे येथे ॲडास चाचणी केंद्र उभारले आहे.

जड वाहनांसाठी ‘ॲडास’ बंधनकारक
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

देशात रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलून पुढील वर्षीपासून म्हणजेच सन २०२७ पासून नव्या व्यावसायिक जड वाहनांमध्ये ‘ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम्स’ (ॲडास) तंत्रज्ञान बंधनकारक करण्यात येणार आहे. इतर चारचाकी वाहनांसाठीदेखील हे तंत्रज्ञान बंधनकारक करण्याबाबत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाला प्रस्ताव पाठविण्यात आला असून, त्याची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

‘एआरएआय’ने देशातील पहिले समर्पित ‘ॲडास’ चाचणी केंद्र पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेजवळील टाकवे येथे उभारले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ‘एआरएआय’चे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी ही माहिती दिली.

डॉ. मथाई म्हणाले, ‘सन २०२७ पासून नव्या व्यावसायिक वाहनांसाठी ‘ॲडास’ तंत्रज्ञान बंधनकारक करण्यात येणार आहे. नव्या मॉडेलच्या व्यावसायिक वाहनांसाठी ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (एईबी), ड्रायव्हर ड्राउझीनेस डिटेक्शन (चालकाला झोप येत असल्याची ओळख), ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन, लेन डिपार्चर वॉर्निंग (ईसीएफ) आणि मूव्हिंग ऑब्जेक्ट डिटेक्शन (विशेषतः मोठ्या वाहनांच्या आसपास न दिसणाऱ्या वस्तूंसाठी) ही पाच ‘ॲडास’ वैशिष्ट्ये अनिवार्य असतील.’

 उर्वरित वृत्त...३

‘ॲडास’ची चाचणी...३

‘एआरएआय’ने देशातील सुवर्ण चौकोन, निवडक राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग, काही शहरी भागांमध्ये डेटा संकलन वाहने तैनात केली आहेत. या वाहनांद्वारे चित्रफीत (व्हिडिओ), रडार, जीपीएस माहिती ही दिवस, रात्र, पाऊस, धुके आणि तीव्र उन्हाच्या परिस्थितीत संकलित केली जाते. हा चाचणी केंद्रातील रस्त्यावर पुन्हा निर्माण करून संवेदक आणि संगणक प्रणालीचे परीक्षण केले जाते.