महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर सडकून टीका करत आहेत; पण राजकीय अवकाशात विरोधकांना जागाच राहू नये यासाठी काही ठिकाणी वेगळे लढण्याचा निर्णय झाला; परंतु एकमेकांवर टीका करण्याचे ठरवूनही प्रछन्न टीका झाली. पालिका निवडणुका झाल्यावर मात्र सर्व काही ठीक होईल. २०२९ नव्हे; तर त्यानंतरही महायुती अभेद्य राहील, असे फडणवीस म्हणाले.
‘ मुंबईतील नागरी समस्या सोडविण्यासाठी महायुती सरकारने मोठे विकास प्रकल्प हाती घेतले असून, त्यात सागरी किनारा मार्गाचे विस्तारीकरण, पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर रस्ता, ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा, ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंतच विस्तार आदींचा समावेश आहे. बीकेसीपासून सागरी किनारा मार्गापर्यंत भुयारी मार्ग तयार करण्याचे नियोजन आहे. उपनगरीय गाड्यांचे दरवाजे स्वयंचलित करण्याबरोबरच तिकिटाचे दर न वाढवता सर्व उपनगरीय गाड्या वातानुकूलित करण्याचे नियोजन आहे,’ असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या विकासाचे व्हिजन मांडले.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मटा कट्टा’ या उपक्रमात शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘मुंबईतील रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी काँक्रिटचे रस्ते बनविण्याचा प्रकल्प राबविण्यात येत आहे.’
‘बदल्या होणे गरजेचे’
महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या वागणुकीबाबत बोलताना फडणवीस यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली. ‘मंत्री-सरकार पाच वर्षांनंतर बदलेल, आपण मात्र येथे कायमस्वरूपी आहोत. अधिकाऱ्यांच्या कालांतराने बदल्या करण्यातही काही अडचणी आहेत. मुंबई महापालिकेचे वेगळे कायदे आहेत; परंतु सनदी अधिकारी सोडले तर इतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याच पाहिजेत,’ असे फडणवीस म्हणाले.
नवीन पिढी आल्याने नाराजी
महापालिका निवडणुकीत राज्यभर भाजपत नाराजी उफाळून आल्याचे दिसून येत होते. त्यावर फडणवीस म्हणाले. ‘दर पाच वर्षांनी राजकारणात नवीन पिढी येते; पण कोव्हिड आणि इतर कारणांमुळे नऊ वर्षांनी निवडणूक होत आहेत. त्यामुळे दोन पिढ्या संधीच्या अपेक्षेत होत्या. त्यामुळे साहजिकच संधी न मिळाल्याने नाराजी दिसून आली.
वैयक्तिक लाभाचा ‘ट्रेंड’
‘लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. आता मतदारांना वैयक्तिक लाभ देण्याचा ‘ट्रेंड’ देशात आहे. मतदाराला निवडणुकीत आपल्याला काय मिळते हे पाहणे गरजेचे वाटते,’ असे फडणवीस म्हणाले.


