नागपूर महानगरपालिकेत भाजपच्या १९ वर्षांच्या अपयशी, भ्रष्ट, जनविरोधी कारभाराबद्दल प्रचंड असंतोष आहे. नागरिकांच्या संतापाचा उद्रेक यंदा प्रचारादरम्यान दिसून आला. मतदारांमध्ये बदलाची जाणीव ठाम असून परिवर्तन होणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ठाकरे यांनी विविध प्रभागांमध्ये पदयात्रा करत मतदारांशी संपर्क साधला. पदयात्रेनंतर काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात ठाकरे यांनी नागपूरकरांनी आता निर्णायक भूमिका घेतली असून काँग्रेसच्या मिशन १०० नगरसेवक हे ऐतिहासिक यश मिळवून देण्याचा ठाम निर्धार केला आहे. या निवडणुकीत नागपूरकरांचा कौल स्पष्ट असून भाजपच्या अपयशाला जनता मतपेटीतून उत्तर देणार असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. ही निवडणूक केवळ नगरसेवकांची नाही, तर नागपूरच्या भवितव्याची लढाई आहे, असेही स्पष्ट केले.








