महापालिका निवडणुकीसाठी मतदारांनी उत्साहात मतदान केले. सकाळी साडेदहानंतर सर्वत्र मतदारांची गर्दी वाढली होती. पुरेसा पोलिस बंदोबस्त आणि मनपा प्रशासनाच्या नियोजनामुळे किरकोळ वाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान केंद्रांची संख्या जास्त असल्यामुळे मतदारांना कमी वेळेत मतदान करता आले.
मनपा निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात वेगवेगळ्या मतदान केंद्रात गर्दी होती. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. बहुतांश मतदान केंद्राच्या दर्शनी भागात मतदारांसाठी सूचना फलक, उमेदवारांच्या नावांची यादी चिन्हासह लावलेली होती. केंद्राच्या बाहेरील परिसरात उमेदवारांचे प्रतिनिधी मतदारांना मतदान केंद्र शोधून देत होते. मनपा प्रशासनाचे प्रतिनिधी मतदान केंद्रात माहिती देत होते. पीरबाजार चौकातील महात्मा फुले शाळेत मतदारांसाठी मंडप उभारण्यात आला होता. सकाळी मतदारांचा निरुत्साह दिसत असतानाच दुपारी बारानंतर अचानक मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र होते. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी विभाग कार्यालय, आयटीआय, देवगिरी महाविद्यालय, मनपा आरोग्य विभाग केंद्र, मदनी हॉल, मजिदी हॉल या सर्व केंद्रांवर गर्दी होती.
प्रभाग तीनमध्येही मतदानासाठी उत्साह दिसून आला. उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, मतदार यांच्या गर्दीमुळे भावसिंगपुरा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने गर्दी आणि वाहने बाजुला हटवत रस्ता मोकळा केला.








