देशाला स्वातंत्र्य मिळून जवळजवळ आठ दशके उलटली... भारत चंद्रावर पोहोचला... डिजिटल क्रांती झाली... अब्जावधींच्या पायाभूत सुविधा देशात आकार घेत आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील गोजबावी-शिर्सुफळ रस्ता आजही बैलगाडीच्या युगात अडकलेला आहे. हा मातीचा रस्ता ग्रामीण प्रशासनाच्या निष्क्रियतेचा, राजकीय उदासीनतेचा आणि विकासाच्या असमानतेचा उघड पुरावा आहे.
गोजबावीतून शिर्सुफळ-उंडवडी मार्गाला जोडणारा मुख्य रस्ता आजही डांबरी झालेला नाही. आजही शाळकरी विद्यार्थी, शेतमाल वाहून नेणारे शेतकरी, रुग्ण, कामगार यांच्यासह वाहनचालकांना मातीच्या रस्त्यावरून कसरत करीत प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीच्या तडाख्यामुळे नागरिकांची दैनंदिन हालअपेष्टा सुरूच आहेत. पंचायत समितीचा बांधकाम विभाग दोन शेतकऱ्यांमधील स्थानिक वाद किंवा नफ्याच्या गणितात अडकलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देत असून, या रस्त्याचा प्रश्न मुद्दाम मागे ढकलला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहे. सरकार ग्रामीण भागात १०० किलोमीटरचे रस्ते पूर्ण झाल्याची आकडेवारी दाखवते, तिथे या गावात नकाशावर असलेला रस्ता प्रत्यक्षात रुतलेल्या मातीचा खड्ड्यांचा प्रवास सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कामाबाबत माहिती देत नाही, त्यामुळे अशी परिस्थिती असल्याचे पंचायत समिती बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी ‘मटा’ला सांगितले.








