चारित्र्यसंपन्न समाज निर्माण व्हावा

महाराष्ट्र टाइम्स

गंगापूर येथे आयोजित हिंदू संमेलनात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी हिंदू समाजाला संघटित होण्याचे आवाहन केले. समाजात समानता, सद्भावना आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्यास सांगितले. स्वदेशी वस्तूंचा वापर करून आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला. जातीपातीतील भेद विसरून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचाही उल्लेख झाला. या संमेलनातून समाज प्रबोधन आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आला.

चारित्र्यसंपन्न समाज निर्माण व्हावा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

जगाला हेवा वाटेल असा चारित्र्यसंपन्न बलशाली समाज आपल्याला घडवावा लागेल. त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण तसे तयार करावे लागेल. भारताच्या भविष्यासाठी हिंदू समाजच जबाबदार असणार आहे. त्यासाठी हिंदू समाजाने स्वतःच्या आचारनातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

हिंदू धर्म परंपरा संस्कृती आणि त्यांचे मूल्यांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने हिंदू संमेलन समिती गंगापूर यांच्या वतीने गंगापूर येथे भव्य हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते.

या संमेलनास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महंत रामगिरी महाराज, जगद्गुरु श्री श्री १००८ शांतिगिरी महाराज, गाथा मूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, आमदार प्रशांत बंब यांची प्रमुख उपस्थिती होती.

या संमेलनात हिंदू समाजातील प्रत्येक घटकांनी संघटित होऊन धर्म जगृतीसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, यासाठी या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले.

समाज प्रबोधन, संस्कृती रक्षण व राष्ट्रभक्तीचा संदेश देणारे विचार या संमेलनातून व्यक्त करण्यात आले. जिल्हा परिषद मैदानावर ध्वजारोहण करण्यात आले. शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शेकडो हिंदू बंधू भगिनी सहभागी झाले होते.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, ‘आपल्याला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. समानता आपल्या केवळ ओठात नको. कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार परंपरांची चर्चा करायला हवी. आपल्याला जगणे जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी आपण घेतली पाहिजे. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशी वस्तूला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे. त्यासाठी आत्मनिर्भय झालो तर आपल्याला शक्तीला अर्थ राहील. या सगळ्या गोष्टींचा आचरणात आणल्या तरच आपण समाज बलशाली बनवू शकू,’असे ते म्हणाले.

जातीपातीतील विभागलेल्या हिंदू समाजाचे त्यांनी संघटन केले. आता हिंदू समाजाने सामाजिक कृपा ठेवून वाटचाल करावी असे आवाहन केले.

रामगिरी महाराजांनी बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधले. हिंदू संमेलन समितीचे अध्यक्ष कृष्णाजी मनाळ यांनी आभार व्यक्त केले व पसायदान आणि कार्यक्रमाची सांगता झाली.