‘दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी ही प्रणाली बसविण्याबाबत चाचण्या सुरू आहेत. या प्रकारच्या वाहनांना ही प्रणाली बसविल्यास त्यांची किंमत वाढेल, असे वाहन उत्पादक कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे थोडा अधिक कालावधी लागत आहे. मात्र, लवकरच दुचाकी, तीनचाकी ई-वाहनांनासुद्धा ही प्रणाली बसविण्यात येईल,’ असेही डॉ. रेजी मथाई यांनी स्पष्ट केले.
‘देशातील इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांचा आवाज येण्याबाबतच्या ‘एआरएआय’ने केलेल्या चाचण्या यशस्वी झाल्या असून, त्याची अंमलबजावणी ऑक्टोबरपासून होणार आहे. तीनचाकी आणि दुचाकींचा आवाज येण्याबाबतच्या चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे या प्रकारची वाहनेही लवकरच बाजारात येतील. ऑक्टोबरपासून आवाज येणारी ई-चारचाकी वाहने बाजारात येतील,’ असे ‘एआरएआय’चे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी सांगितले.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’तर्फे (एआरएआय) वाहन उद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ‘एआरएआय’चे संचालक डॉ. मथाई यांनी ही माहिती दिली. धुके आणि रात्रीच्या प्रवासासाठी सुसह्य ठरू शकणारी विशेष चाचणी सुविधा ‘एआरएआय’ स्थापन करणार आहे. त्यामुळे देशातील महामार्गांवर भेडसावणाऱ्या कमी दृश्यमानतेशी संबंधित आव्हानांवर मात करता येईल. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेतला आहे.
‘ई-चारचाकींबाबत प्रणालीची तयारी ‘एआरएआय’ने केली असून, त्याची यशस्वी चाचणी घेतली आहे. ही प्रणाली ई-वाहन उत्पादक कंपन्यांना दिली आहे. ही प्रणाली बसविल्यास ई-वाहनांचे अस्तित्व लक्षात येऊन सुरक्षा अधिक बळकट होईल. ही प्रणाली प्रवासी वाहने, मालवाहू वाहनांनाही बसविण्यात येणार आहे. ही प्रणाली वाहन २० किलोमीटर प्रतितासपेक्षा कमी वेगाने धावत असताना आवाज करील. त्यामुळे पादचारी, सायकलस्वार आणि इतर वाहनांना ई-वाहन येत असल्याची जाणीव होईल. ही प्रणाली वाहन मागे घेतानादेखील आपोआप सक्रिय होते,’ असेही मथाई यांनी सांगितले.
संबंधित वृत्त...४






