राज्यात गेल्या सहा वर्षांमध्ये श्वानदंशाची ३० लाखांहून अधिक प्रकरणे नोंदविण्यात आली असून, २०२४ या वर्षात मुंबईत १.२८ लाख घटना घडल्या आहेत. राज्यात दररोज सरासरी १,३६९ जणांना कुत्री चावत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विधान परिषदेतील प्रश्नोत्तरांत ही माहिती समोर आली. मुंबईत २०१४ ते २०२४ या कालावधीत भटक्या श्वानांच्या संख्येत घट झाल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
प्रश्नोत्तरांदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. यातून राज्यातील श्वानदंशाच्या घटनांची धक्कादायक आकडेवारी समोर आली. मुंबई महापालिकेमार्फत २०१४मध्ये याबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी ९५,१७२ भटके श्वान आढळून आले. २०२४मध्ये ही संख्या ९०,७५७ नोंदवली गेली. पालिका क्षेत्रात आठ निर्बीजीकरण केंद्रे सुरू आहेत. तेथे भटक्या श्वानांचे नियमित निर्बीजीकरण करण्यात येते.
उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयामध्ये वर्ष २०२४-२५मध्ये एकूण २,४४२ श्वानदंशाचे रुग्ण तसेच, वर्ष २०२५-२६मध्ये जानेवारी २०२६ अखेर श्वानदंशाचे २,७९२ रुग्ण उपचारासाठी आले होते. श्वानदंशाचे सरासरी दोनशे रुग्ण येत असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. तर पनवेल शहरात गेल्या दोन वर्षांत अशा १२,४०० घटनांची नोंद झाली असून, या नागरिकांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व उपचार करण्यात आले.








