युद्धस्थिती गंभीर झाल्याने दुबईमध्ये अनेक मराठी पर्यटक अडकून पडले आहेत. त्यामध्ये पुणे, सांगली व कोल्हापूर येथील दहा ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सद्यस्थितीत या प्रवाशांच्या परतीचे मंगळवारचे विमानोड्डाण गुरुवारी (१२ फेब्रुवारी) होणार असले, तरी त्याबाबत अनिश्चितता आहे. चौकशीव्यतिरिक्त सरकारकडून काहीही दिलासा मिळत नसल्याची नाराजी या प्रवाशांनी व्यक्त केली.
पुणे, सांगली व कोल्हापूर येथील दहा ज्येष्ठ नागरिकांचा गट मागील आठवड्यात दुबईला गेला होता. मंगळवारी त्यांचे परतीचे नियोजन होते. मात्र, रविवारपासून संघर्ष चिघळल्याने विमानोड्डाण रद्द होऊन हे प्रवासी तिथेच अडकून पडले आहेत. परतीचा विमान प्रवास वारंवार रिशेड्यूल होत आहे. आमच्याकडील पैसे संपत चालले आहेत. हॉटेलचे बुकिंगही समाप्त झाले आहे. परतीच्या प्रवासाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नाही, अशी तक्रार हे प्रवासी करीत आहेत.
दरम्यान, अबुधाबीच्या प्रशासनाने प्रवाशांसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था केली आहे. मात्र, दुबईत तशी कोणतीही सुविधा नसल्याने भारतीय प्रवासी हवालदिल झाले आहेत. भारत सरकारकडून फोनद्वारे चौकशी केली आहे. मात्र, त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केलेली नाही, असे एका प्रवाशाने सांगितले.








