‘केवळ कृषी उत्पादन वाढवणे नाही, तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण समृद्धी वाढवणे आणि आत्मनिर्भर व विकसित भारत घडवणे, हे केंद्र सरकारचे ध्येय आहे. त्यासाठीच सरकार नवीन कीटकनाशक कायदा आणि बियाणे कायदा आणणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, प्रमाणित खते आणि सुरक्षित व प्रभावी कीटकनाशके मिळतील’, असे केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.
अनुदान मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना चौहान म्हणाले, ‘सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत या प्रकल्पांना प्राधान्य दिले आणि सुमारे २७ लाख हेक्टर अतिरिक्त सिंचित क्षेत्र सुनिश्चित करण्यासाठी कामाला गती दिली. वाजपेयी सरकारचा 'नदीजोड' हा प्रकल्पही मोदी सरकारच्या काळात खऱ्या अर्थाने पुढे सरकला. एक कोटी शेतकऱ्यांना शिक्षित करणे, १.८ दशलक्ष शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि ७.५ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर टप्प्याटप्प्याने नैसर्गिक शेतीची अंमलबजावणी करणे हे नैसर्गिक शेती अभियानाचे उद्दिष्ट आहे.’







