सभागृहातील अल्पकालीन चर्चेच्या प्रस्तावाचे विधिमंडळ सचिवालयाकडून राजकारण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी बुधवारी विधानसभेत केला.
विरोधी पक्षाचा वेगळा प्रस्ताव करण्याचा उद्योग कुणी केला, असा प्रश्न करत जाधव यांनी विधिमंडळाच्या कामकाजात तटस्थता राखली गेली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विधानसभेत बुधवारी नियम १०१ अन्वये सत्ताधारी पक्षाच्या वतीने कोकणच्या प्रश्नावर अल्पकालीन चर्चा उपस्थित करण्यात आली.
या चर्चेत सहभागी होण्यापूर्वी जाधव यांनी कोकणच्या संदर्भातील विषयावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असे दोघांचे प्रस्ताव एकाचवेळी दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.







