Russia To Provide More S 400 Systems To India Strengthening Defense Against Pakistan
रशिया आणखी ‘एस-४००’ प्रणाली देणार; पाकिस्तानपासून संरक्षणासाठी मिळणार बळ
महाराष्ट्र टाइम्स•
India-Russia Relations: रशिया भारताला आणखी एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली देणार आहे, ज्यामुळे भारताची संरक्षण क्षमता अधिक मजबूत होईल. यापूर्वी २०१८ मध्ये झालेल्या करारानुसार, काही युनिट्स भारताला मिळाली आहेत, तर उर्वरित युनिट्स लवकरच मिळण्याची शक्यता आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षात या प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
वृत्तसंस्थ, नवी दिल्ली: रशिया भारताला आणखी एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली देणार आहे. पाकिस्तानसोबतच्या संघर्षात संरक्षणाच्या दृष्टीने या प्रणालीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजवली होती. मागील कराराअंतर्गत या प्रणालीचे दोन युनिट भारतात लवकर पोचवण्याच्या दृष्टीने रशियासोबत चर्चा सुरू आहे. भारताने आणखी युनिट खरेदीचेही नियोजन केले आहे.
जमिनीवरून हवेत मारा करून क्षेपणास्त्रांचा वेध घेण्याची क्षमता असलेली ‘एस-४००’ ही अत्याधुनिक यंत्रणा भारतासाठी महत्त्वाची ठरली. या यंत्रणेचे युनिट पुढील वर्षी भारताला मिळण्याची शक्यता असून, आणखी एक युनिट २०२७मध्ये मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत सन २०१८मध्ये रशियासोबत करार करण्यात आला होता. त्याअंतर्गत ही युनिट भारताला मिळणार आहेत. त्या वेळी भारताने या प्रणालीच्या पाच युनिटची खरेदी केली होती.रशियाकडून ही प्रणाली मिळण्यात विलंब होत असल्याचा मुद्दा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी गेल्या वर्षी रशिया दौऱ्यात उपस्थित केला होता. यापूर्वीच्या खरेदीतील दोन युनिट भारतात येत्या दोन वर्षांत दाखल होती. मात्र, भारत आणखी एस-४०० प्रणालीचे युनिट खरेदी करण्याचे नियोजन करीत आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी सुदर्शन चक्र प्रकल्पाच्या विकासासाठी ही खरेदी महत्त्वाची ठरणार आहे.
भारताने रशियाकडून एस-४०० सुरक्षा प्रणालीचे पाच युनिट खरेदीसाठी २०१८मध्ये करार केला होता. सुमारे ३९ हजार कोटी रुपयांचा व्यवहार आहे. मात्र, यातील युनिट मिळण्यास विविध कारणांनी विलंब झाला आहे. सन २०२१ आणि २०२३ या काळात तीन युनिट भारताला मिळाली आहेत. उर्वरित दोन युनिटची अद्याप प्रतीक्षा आहे.