Supreme Court: 'पॉडकास्टमध्ये माफी मागा'; समय रैनासह 5 इन्फ्लुएन्सरना न्यायालयाचा आदेश

महाराष्ट्र टाइम्स

Samay Raina: सर्वोच्च न्यायालयाने 'इंडियाज गॉट टॅलेंट'चे सूत्रसंचालक समय रैना आणि अन्य सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना दिव्यांग व्यक्तींची थट्टा केल्याबद्दल माफी मागण्याचे आदेश दिले. व्यावसायिक भाषण मूलभूत अधिकारांतर्गत येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या सामग्रीचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले असून, भविष्यात दंड आकारण्याचा विचार असल्याचे सांगितले.

SC orders Samay Raina and 5 influencers to apologize on a podcast
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: व्यावसायिक आणि प्रतिबंधित भाषणे मूलभूत अधिकारांतर्गत येत नाहीत, असे सांगत ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सूत्रसंचालक समय रैना यांच्यासह पाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांना दिव्यांग आणि दुर्मिळ अनुवांशिक आजार असलेल्यांची थट्टा केल्याबद्दल त्यांच्या पॉडकास्ट किंवा कार्यक्रमांमध्ये बिनशर्त माफी मागावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे.

रैनासह पाच प्रभावकांवर अपंग आणि स्पाइनल मस्क्युलर अ ॅट्रोफी आणि दृष्टीदोषाने ग्रस्त असलेल्यांची थट्टा केल्याचा आरोप आहे. १५ जुलै रोजी, सर्वोच्च न्यायालयाने रैनासह पाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना दिव्यांग व दूर्मिळ आजारग्रस्तांची खिल्ली उडवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या खटल्यात न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार सोमवारी सोनाली ठक्कर ऊर्फ सोनाली आदित्य देसाई वगळता, रैनासह चार इन्फ्लुएन्सर न्यायालयात उपस्थित होते.
‘पश्चात्तापाची तीव्रता ही अपमानाच्या पातळीपेक्षा जास्त असली पाहिजे आणि दिव्यांगांना अपमानित केल्याबद्दल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना पुढील काळात दंड आकारण्याचा विचार न्यायालय करेल,’ असे न्यायाधीश सूर्यकांत आणि जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान सांगितले. न्यायमूर्ती कांत यांनी इन्फ्लुएन्सर किती दंड भरण्यास तयार आहेत, याची माहिती देण्यास सांगितले, ज्याचा वापर एसएमएसारख्या दुर्मिळ अनुवांशिक विकारांनी ग्रस्तांच्या उपचारांमध्ये केला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. न्यायमूर्ती बागची म्हणाले की, इन्फ्लुएन्सरने विविध समुदायांशी संबंधित विनोद निर्माण करताना अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे, विशेषतः जेव्हा ते ‘समाजातील भेदाभेदाशी’ शी संबंधित असते. अॅटर्नी जनरल आर वेंकटरमाणी यांना सर्व भागधारकांचे विचार विचारात घेऊन सोशल मीडियावरील सामग्रीचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यास सांगितले.