बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावाच्या हद्दीत नीरा नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. पाण्यात झालेल्या प्रदूषणामुळे नदी अक्षरशः ‘मृत्यूकूप’ बनली आहे. मृत माशांमुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
बारामती तालुक्यातील काही सहकारी साखर कारखाने, कत्तलखाने व दुग्धप्रक्रिया उद्योग, तर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विविध औद्योगिक युनिट्समधून सोडण्यात येणारे सांडपाणी, नाले व ओढ्यांमधून येणारे दूषित पाणी यामुळे नीरा नदीचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. एके काळी पिण्यास योग्य असलेले नीरा नदीचे पाणी आता पूर्णतः वापरायोग्य राहिले नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
‘नदीत तरंगणारे मृत मासे नागरिक खाण्यासाठी घेऊन जात आहे. कोणत्या घटकांमुळे मासे मृत्यू झाले, याबाबत स्थानिक अनभिज्ञ आहे. मात्र, असे मृत मासे खाणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते,’ असे स्थानिक रहिवासी एकनाथ कोकरे म्हणाले.



