संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. म. शहाजिंदे म्हणाले, की मराठवाड्यात मराठी भाषेचा जन्म होऊन मराठी संस्कृतीची निर्मिती झालेली आहे. ही भूमी जशी मराठी संतांची, त्यांच्या भक्ती आंदोलनाची आणि आध्यात्मिक संत काव्याची आहे, तशीच ती मराठी सुफी संतांची, त्यांच्या भक्ती चळवळीची आणि सुफी काव्याचीही भूमी आहे. मराठी आणि सुफी मुसलमान संतांनी आपल्या भेदभावरहित बंधुभावाने ही भूमी जशी अध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध केलेली आहे, तशी ती गोदावरी-पूर्णा-सिंदफणा-मांजरांसारख्या नद्यांनी कसदारही केलेली आहे. अशा भूमीतच सुफी संतांनी दुबार पेरणीची रीत सुरू करून ती सांस्कृतिकदृष्ट्या अधिक श्रीमंत केलेली आहे. याच भूमीत सुफी संतांनी भारतीय संस्कृतीशी आपल्या आध्यात्मिक विचारांची सांगड घालून आमच्यासारख्या स्त्री, शुद्र, अतिशूद्रांना उराशी लावून इथली स्पर्शबंदी उठवली. एका ताटात जेवायला घेऊन रोटीबंदी उठवली आणि आपल्या प्रार्थनेत खांद्याला खांदा लावून भक्तिबंदीही उठवली.
‘पुढच्या पिढीत वाचन चळवळ रुजावी यासाठी मराठी साहित्यात वैज्ञानिक दृष्टिकोन येणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. दिगंत प्रकाश आमटे यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील आर्वी येथील शांतिवन येथे केले. पंचेचाळिसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाट्नावेळी ते बोलत होते.
कवी विठ्ठल बीडकर व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. म. शहाजिंदे, माजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष भारत सासणे, कवी फ. मु. शिंदे, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील, उपाध्यक्ष आसाराम लोमटे, प्रा. गणेश मोहिते, सामाजिक कार्यकर्ते गिरीश कुलकर्णी, स्वागताध्यक्ष दीपक नागरगोजे, आमदार सुरेश धस, सरपंच मीराताई यादव उपस्थित होते. अध्यक्षपदाची सूत्रे या वेळी नूतन अध्यक्षांकडे प्रदान करण्यात आली.
डॉ. आमटे म्हणाले, की महाविद्यालयात असताना सुरेश भट यांच्या गझलांचा चाहता होतो. माझे आजोबा दिवंगत बाबा आमटे यांची समाजसेवक म्हणून मोठी ख्याती होती. त्या तुलनेत बाबांच्या साहित्याकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले. बाबा आमटे यांचे ‘ज्वाला आणि फुले’ हे पुस्तक मला महत्त्वाचे वाटते. महाविद्यालयात शिकत असताना डिप्रेशन आले की त्यांच्या कविता मला प्रेरणा द्यायच्या. आनंदवनात पु. ल. देशपांडे यांच्यापासून अलीकडच्या अनेक साहित्यिकांपर्यंत सर्वांची वर्दळ असायची. त्यामुळे अनेकांशी स्नेह होता. भेटता, बोलता यायचे. वाचन संस्कृती जर वाढवायची असेल, तर पुस्तकांना आधुनिक रूप देता आले पाहिजे. ऑडिओ बुक्स, किंडल्स जास्तीत जास्त मराठी भाषेत रूढ करायला हवीत. मुलांनी मोबाइलवर रील पाहण्यापेक्षा कसदार साहित्य जर त्यांच्या हातात आपण उपलब्ध करून दिले, तर पुढची पिढी प्रक्षोभक वक्तव्य करण्यापासून आपल्याला दूर येता येईल.
संबंधित वृत्त... ३




