सहा दशकांचा जेतेपदांचा दुष्काळ आयुष आज संपवणार?

Contributed byम. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टी आज इतिहास रचू शकतो. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत त्याने प्रवेश केला आहे. अव्वल मानांकित कुनलावूत वितिदसर्नला हरवून त्याने ही कामगिरी केली. आता सहा दशकांनंतर भारताला विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. आयुषने आपल्या आक्रमक आणि बचावात्मक खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. अंतिम फेरीत त्याचे आव्हान असेल.

ayush shetty may write history today

आयुष शेट्टीला आज, रविवारी इतिहास घडवण्याची संधी आहे. आयुषला भारताचा आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीतील विजेतेपदाचा सहा दशकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. त्याने निंगबो (चीन) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी अव्वल मानांकित आणि गतविजेत्या कुनलावूत वितिदसर्न याला हरवून आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

जागतिक क्रमवारीत २५व्या असलेल्या आयुषने सरस आक्रमणास भक्कम बचावाची जोड देत कुनलावुतला तीन गेमच्या लढतीत हरवले. आयुषने पहिला गेम गमावल्यावर खेळ उंचावत १०-२१, २१-१९, २१-१७ अशी बाजी मारली. कुनलावुत हा २०२३चा जागतिक विजेता आहे तसेच पॅरिस ऑलिम्पिकचा उपविजेता. मात्र आयुषने त्याला चुका करायला भाग पाडले.

आयुषने खेळाची गती सातत्याने बदलली तसेच फटक्यांची दिशाही. त्यामुळे कुनलावुतचा गोंधळ उडाला. त्याचा फायदा आयुषने घेतला. या सामन्यातील दुसरा गेम जास्त मोलाचा होता. पहिला गेम गमावलेल्या आयुषला २०-१४ ही मोठी आघाडी २०-१९ अशी कमी झाल्याचे पहावे लागले. या परिस्थितीत चुका होण्याची शक्यता जास्त असते. मात्र त्याचवेळी त्याने संयम राखला. आयुषचा शांतपणा पाहून कुनलावुतकडून चुक झाली आणि त्याचा फायदा या युवा भारतीयाने घेतला. ‘आयुषने फिटनेसवर जास्त भर देत आहे त्याचा फायदा होत आहे. दिर्घ रॅलिजसाठी तो तयार होता. त्यामुळेच तो संयम राखू शकला. त्याने हार्ड स्मॅश आणि ड्रॉप्सद्वारे कुनलावुतला गोंधळात टाकले,’ याकडे सेंटर ऑफ बॅडमिंटन एक्सलन्समध्ये (पूर्वीची प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी) आयुषला मार्गदर्शन केलेल्या सागर चोपडा यांनी सांगितले.

आयुषने या स्पर्धेतील पदकविजेत्या साजेसा खेळ केला आहे. त्याने उपांत्य फेरीपूर्वी एकही गेम गमावला नव्हता. मात्र त्यानंतरही अंतिम फेरीपूर्वीचाअडथळा सोपा नव्हता. त्याला यापूर्वीच्या कुनलावुतविरुद्धच्या सामन्यांत दोन गेममध्ये हार पत्करावी लागली होती. कदाचीत या आठवणीमुळे आयुषचा खेळ सुरुवातीस बहरला नाही. त्याचवेळी कुनलावुत सुरुवातीपासून आव्हानास तयार होता. पिछाडीनंतर आयुशने जिगरबाज खेळ करीतचि६ पूर्ण बदलले.