‘ दीक्षाभूमी येथील प्रबोधनाचा कार्यक्रम व्हावा, यासाठी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त सुरेई ससाई यांना विनंती केली होती. यासंदर्भात शहरातील काही मान्यवरांनी त्यांची भेटदेखील घेतली होती. परंतु, त्यांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यांच्या या निर्णयाचा आम्ही आदर करत कार्यक्रम रद्द केला’, अशी भावना डॉ. प्रदीप आगलावे यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दीक्षाभूमी येथे आयोजित केला जाणारा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त सुरेई ससाई यांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीने पत्रपरिषदेत दिली.
२०१५पासून डॉ. आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख या धर्मांसह ओबीसी आणि मराठा सेवा संघाचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदा १४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा पार पडणार होता. मात्र, ऐनवेळी परवानगी नाकारल्याने आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. या पत्रपरिषदेला डॉ. सुचित बागडे, डॉ. एस. बी. गेडाम, डॉ. अशोक उरकुडे, राजेश लोखंडे, प्रा. घनश्याम धाबर्डे, अमन कांबळे, श्रीराम बनसोड, सुरेश तामगाडगे, डॉ. राजकुमार कोसे उपस्थित होते.



