‘बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय महाविकास आघाडी ने घेतला. मात्र, अपक्षांमुळे निवडणूक होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पक्षाकडून आमंत्रण आलेले नाही,’ अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी केली. सुनेत्रा पवारांचा प्रचार करण्याबाबत महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दीनिमित्त महात्मा फुले पेठ येथील फुले वाड्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर खासदार सुळे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘सुनेत्रा पवार यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असल्याने आघाडीतील सर्वच पक्षातील वरिष्ठांची छायाचित्रे निवडणूक अर्ज भरताना वापरायला हवी होती. राहुरीतील निवडणूक बिनविरोध होण्याबद्दल आमच्याशी कोणीही संपर्क केला नाही. प्राजक्त तनपुरे यांनी वैयक्तिक प्रश्नांमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली.’
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूबाबत कर्नाटक राज्यात गुन्हा दाखल होतो. वास्तविक महाराष्ट्राने दादांना न्याय द्यायला हवा होता. मात्र, त्याची सुरुवात कर्नाटकातून झाल्याने तेथील सरकारचे आभार. ज्या मागण्या रोहित पवारांनी केल्या आहेत, त्या प्राधान्याने मान्य करून त्यावर अंमलबजावणी करावी. र्घटनास्थळावरून दादांचे फोन सापडले, मग ब्लॅक बॉक्स का सापडत नाही,’ असा प्रश्न उपस्थित करून सुळे यांनी दादांसोबत इतर पाच लोकांचा मृत्यू झाला, त्यांनाही न्याय मिळावा, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले.



