जायकवाडी धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान चार आवर्तने, पिण्यासाठी राखीव पाणी तरतूद केली आहे; तसेच जायकवाडी धरणातील गाळ काढून केटीवेअर बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जायकवाडी धरणातील गाळ काढण्याचा धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावर होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पैठण येथील संतपीठ येथे बुधवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी खासदार डॉ. कल्याण काळे, रामराव वडकुते, आमदार विलास भुमरे, रमेश बोरणारे, हिकमत उढाण, विजयसिंह पंडित, माजी मंत्री राजेश टोपे, अमरसिंह पंडित, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, प्रकाश सोळंके आदी उपस्थित होते. नांदूर मधमेश्वर कालव्यात उन्हाळी ४ आवर्तनासाठी आणि निम्न दुधना प्रकल्प मधून चार आवर्तनाला मान्यता देण्यात आली.



