मालहाताळणी क्षेत्राला हवाय कौशल्यविकास

महाराष्ट्र टाइम्स

भारताच्या मालहाताळणी क्षेत्राला २०३० पर्यंत ४७ लाख कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास आणि डिजिटल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. लॉजिस्टिक्स उद्योगात २०२५ मध्ये रोजगारात वाढ दिसून आली. महिलांना या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे भारताच्या विकासाला गती मिळेल.

urgent need for skill development in the logistics sector
देशाच्या मालवाहतूक (लॉजिस्टिक्स) क्षेत्रात २०३० पर्यंत तब्बल ४७ लाख नवीन नोकऱ्यांची गरज भासणार आहे. ही मोठी तफावत भरून काढण्यासाठी, देशात मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास आणि डिजिटल कामगारांची फौज उभी करावी लागेल, असे ‘लॉजिस्टिक्स सेक्टर स्किल कौन्सिल’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. २०२५ मध्ये या उद्योगात मोठ्या प्रमाणात भरती झाल्याचे दिसून आले असून, वर्षाच्या उत्तरार्धात रोजगारात १०.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे उद्योगाचा विस्तार होत असल्याचे आणि अनेक जागा भरल्या जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

मालवाहतूक, गोदाम व्यवस्थापन (वेअरहाउसिंग), वाहतूक आणि पुरवठा साखळीतील (सप्लाय चेन) वाढीमुळे २०३० पर्यंत ४७ लाख अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासेल. ही मागणी पूर्ण करण्यासाठी, कौशल्य विकासात सुधारणा करणे आणि ‘डिजिटल वर्कफोर्स’ तयार करणे अत्यंत गरजेचे आहे, असे लॉजिस्टिक्स सेक्टर कौन्सिलचे सीईओ रविकांत यमर्थी यांनी ‘लॉजीमॅट इंडिया २०२६’ मध्ये सांगितले.
या क्षेत्रात महिलांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण करण्यावरही भर दिला जात आहे. नौवहन महासंचालक श्याम जगन्नाथन यांनी सांगितले की, ‘सागर पे सन्मान’च्या माध्यमातून आम्ही या क्षेत्रातील महिलांना सलाम करतो. जेव्हा महिला या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील, तेव्हा भारताच्या विकासाची गाथा अधिक वेगाने पुढे जाईल. लॉजिस्टिक्स क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढल्यास देशाच्या प्रगतीला आणखी गती मिळेल.