चेन्नईतील गोल्डन बीचवर सेल्फी घेत असतानाच आलेल्या उंच लाटांनी समुद्रात ओढून घेतल्याने मयुरी हरिश्चंद्र चौधरी (रा. वरठी, भंडारा रोड) या तरुणीचा बुडून मृत्यू झाला.
चेन्नईतील कॉग्निझन्ट या आयटी कंपनीमध्ये राज्यातील १५ युवक-युवतींची इंटर्नशिपसाठी निवड झाली. शनिवारी सुट्टी असल्याने हे सर्व चेन्नईतील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेले होते. बीचवर सेल्फी घेत असताना अचानक दहा ते पंधरा फुटांच्या लाटा निर्माण झाल्या. या लाटांसोबत मयुरीसह जय पाटील आणि राज केदारी हे तिघे ओढल्या गेले. बचाव पथकाने तातडीने धाव घेऊन, तिघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. राज सुरक्षितपणे बाहेर आला. मात्र, मयुरीचा बुडून मृत्यू झाला असून, जयचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मयुरीच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी आक्रोश केला.



