काँग्रेसचा भाजप कार्यालयावर मोर्चा

महाराष्ट्र टाइम्स
काँग्रेसचा भाजप कार्यालयावर मोर्चा
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
मोर्चापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मागील १२ वर्षांपासून देशातील लोकशाही आणि संवैधानिक मूल्ये दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. परीक्षा पद्धतीत सुधारणा करावी आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली होती; मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप सपकाळ यांनी केला.

नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद बुधवारीही मुंबईत उमटले. काँग्रेसने थेट भाजप कार्यालयावर मोर्चा काढला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होत त्यांना पाठिंबा दर्शविला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मोर्चा काढण्यात आला. भाजप कार्यालयाकडे कूच करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी रिगल सिनेमाजवळ ताब्यात घेतले. या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान, आमदार भाई जगताप, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, माजी खासदार हुसेन दलवाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रकाश सोनावणे, अभिजित सपकाळ, अमित कारंडे, राणी अग्रवाल, झिशान अहमद, ब्रिज दत्त, आनंद सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.