विसर्ग आणखी दोन दिवस!

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स
flooding crisis in bhandibazaar
भांडीबाजारातील सखल भागात पाणी साचल्याने अनेक व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले. परिणामी मालाचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे दुकानांतील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास व्यावसायिकांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही. अनेक व्यावसायिकांची पावसाचा अंदाज घेऊन साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याची लगबग सुरू होती.

पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली, तरी गंगापूर धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचल्याने पुढील दोन दिवस विसर्ग सुरूच राहणार आहे. जलसंपदा विभागाचे ४६० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे नियोजन असून, त्यामुळे गोदाकाठावर पूरस्थिती कायम राहणार आहे. परिणामी रामकुंड परिसर दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी दिली.
संभाव्य धोका टळला नसल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. दरम्यान, १ जूनपासून मराठवा़ड्यातील जायकवाडी धरणाकडे ८.६ टीएमसी पाणी गेले आहे. गेले तीन पावसाने नाशिककरांना झोडपून काढले. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमध्येदेखील पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे जिल्ह्यातील २६ धरणांमधील एकूण साठा ७२.४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणांमध्ये ६६.३५ टक्के साठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा टक्के अधिक पाणीसाठा आहे. होळकर पुलाखालून २७ हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. पावसाचा जोर ओसरल्याने तो १८ हजार क्युसेकपर्यंत आणण्यात आला आहे.

पाणीसाठा ८५ टक्क्यांवर

गंगापूर धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचला आहे. परंतु, पावसाच्या हंगामाचे अजून दोन महिने बाकी असल्याने पाणीसाठा मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळेच तो ८५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धरणातील साधारणत: ४६० दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याने गोदाकाठ परिसरात पूरस्थिती कायम असणार आहे. गोदावरी नदीपात्रात होळकर पुलाखालून १९ हजार क्युसेकने विसर्ग सुरू राहणार असून, तो सामान्य स्थितीत येण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

भांडीबाजारातील सखल भागात पाणी साचल्याने अनेक व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले. परिणामी मालाचे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे दुकानांतील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यास व्यावसायिकांना पुरेसा वेळ मिळू शकला नाही. अनेक व्यावसायिकांची पावसाचा अंदाज घेऊन साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याची लगबग सुरू होती.