मान्सून केरळच्या उंबरठ्यावर दाखल

Contributed byमुंबई|महाराष्ट्र टाइम्स

मान्सून आता केरळच्या सीमेवर पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने आज, गुरुवारी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे देशात पावसाळ्याची सुरुवात होणार आहे. मान्सूनचे वारे तमिळनाडू आणि लक्षद्वीप बेटांपर्यंत पसरण्याचीही शक्यता आहे. मुंबईतही हलका पाऊस झाला आहे.

monsoon enters kerala rain gives relief to mumbai

मे महिन्यामध्ये देशात दाखल होण्याची अपेक्षा असलेला मान्सून अखेर देशाच्या उंबऱ्यापाशी येऊन उभा राहिला आहे. केरळमध्ये आज, गुरुवारी मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या आनंदवार्तेसोबतच मुंबईमध्ये बुधवारी सकाळी तुरळक ठिकाणी पावसाने अचानक हजेरी लावल्याने काही वेळ उकाड्यापासून दिलासाही मिळाला. मुंबईत कमाल तापमानही काहीसे खाली आले.

मान्सूनची रेषा ३० मेनंतर पुढे सरकलेली नसली तरी २४ तासांमध्ये मान्सून केरळमध्ये प्रगती करू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने ३ जून रोजी जाहीर केली. केवळ केरळच नाही तर तमिळनाडूचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय आणि नैर्ऋत्य भाग, लक्षद्वीप बेटे या संपूर्ण भागांमध्ये मान्सूनचे वारे पसरतील अशीही शक्यता आहे.