छावणी येथील लोखंडी पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ( पीडब्ल्यूडी ) वतीने मंगळवारी डांबरीकरण करण्यात आले. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. पावसाळ्यात नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी तातडीने डांबरीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरहून पुणे, अहिल्यानगर, नाशिक, मुंबईला जाण्यासाठी हा एकमेव प्रमुख रस्ता आहे. शिवाय वाळूज औद्योगिक वसाहत, वेरुळ, खुलताबादकडे दररोज ये – जा करणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. छावणीत खामनदीवरील हा पूल उभारून अनेक वर्षे उलटून गेले. ‘पीडब्ल्यूडी’ने नवीन पुलासाठी प्रस्ताव सादर केला आहे. कारण या पुलाची एकूण क्षमता व वाढलेली वाहने पाहता भविष्यात अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, पर्यायी पूल उभारणीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, पुलावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पावसाळ्यात वाहनधारकांना त्रास होऊ नये, यासाठी ‘पीडब्ल्यूडी’ने मंगळवारी पुलाच्या दोन्ही बाजूंनी दोन थर डांबरीकरण केले. त्यामुळे पावसाळ्यात त्रास होणार नाही, अशी अपेक्षा आहे. डांबरीकरणावेळी एका बाजूची वाहतूक बंद केली गेल्याने काही काळ कोंडी झाली.






