परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वाहतूकदारांना कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. वाहतूकदारांना ठोठावण्यात आलेल्या अन्यायकारक ई-चलानविरोधात केवळ थातूरमातूर उत्तरे देण्यात येत आहे, असा आरोप करत ५ मार्चपासून राज्यात चक्काजाम करण्यात येणार आहे, असे महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीने सांगितले. यात ट्रक, टेम्पो, टॅक्सी, टँकर तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसगाड्या बंद राहतील.
वाहतूकदारांच्या मागण्यांबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या पदाधिकारी यांची मुंबई सेंट्रल येथे बैठक झाली. ई-चलानाच्या संदर्भात वाहतूकदारांच्या भावना तीव्र असल्याचे मान्य करत सरकार या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेईल. त्यामुळे वाहतूकदारांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूकदारांना केले.







