अडून बसलेल्यावरासह चौघांवर गुन्हे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

यवतमाळात साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख ठरली. मात्र, नियोजित वराने लग्नासाठी प्रशस्त एसी हॉलची अट घातली. ही अट पूर्ण न झाल्यास लग्न मोडण्याची धमकी देण्यात आली. मुलीच्या वडिलांनी समेट घडवण्याचा प्रयत्न केला. अखेर या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी नियोजित वरासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. गिरी कुटुंबीयांनी साखरपुड्यावेळी कोणतीही अट नसल्याचे सांगितले होते.

four accused in wedding cancellation threat case from yavatmal

यवतमाळ : साखरपुड्यानंतर लग्नाची तारीख निश्चित झाली. तीन दिवसांनी लग्न यवतमाळातील सर्वांत प्रशस्त वातानुकूलित हॉलमध्ये व्हावे, अशी अट नियोजित वरासह त्याचे वडील, काका आणि मामाने घातली. ‘चर्चेतून आपण मार्ग काढू’, अशी गळ मुलीच्या वडिलांनी घातली; पण नियोजित वरासह नातेवाइकांनी थेट लग्न मोडण्याची धमकी दिली. याविषयीची तक्रार दाखल होताच मारेगाव पोलिसांनी नियोजित वरासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयूर सुरेश गिरी (३३), सुरेश भाऊगीर गिरी (५५), नामदेव भाऊगीर गिरी (६७, सर्व रा. पिंपळगाव (यवतमाळ) व सतीश दिवाकर गिरी (४५, रा. चांदूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. साखरपुड्याच्या वेळी ‘आमची कुठलीही अट नाही,’ असे गिरी कुटुंबीयांनी सांगितले होते. मात्र, मयूरने ४ मार्च रोजी रात्री मोबाइलवर मुलीशी संपर्क साधून आपले लग्न यवतमाळातील सर्वांत प्रशस्त एसी हॉलमध्येच झाले पाहिजे, असे बजावले.