आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात केलेल्या आरोपांशी संबंधित प्रकरणात आसाम पोलिसांनी मंगळवारी काँग्रेस नेते पवन खेरा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला. खेरा तिथे नव्हते; मात्र त्यांच्या घरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पवन खेरा यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना आसामचे पोलिस उपायुक्त देबोजित नाथ म्हणाले की, खेरा त्यांच्या निवासस्थानी आढळले नाहीत. मात्र, घराची झडती घेण्यात आली आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. काही आक्षेपार्ह साहित्यही सापडले असून, तूर्त त्याचा तपशील उघड करता येणार नाही.
खेरा यांच्या विधानांबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर गुवाहाटीतील गुन्हे शाखा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेरा यांचा सध्या ठावठिकाणा माहीत नाही. परंतु, त्यांचा शोध घेतला जाईल, असे उपायुक्तांनी सांगितले. आसाम पोलिसांच्या पथकाने दिल्लीत आल्यावर दिल्ली पोलिसांना औपचारिकपणे कळवले. त्यानंतर स्थानिक पोलिस पथकही कार्यवाहीत सहभागी झाले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
सरमा यांच्या पत्नीकडे तीन पासपोर्ट असल्याचा आणि त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात पत्नीच्या मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप खेरा यांनी रविवारी केल्यानंतर सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडली आहे. खेरा यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना सरमा म्हणाले की, काँग्रेसने पाकिस्तानी सोशल मीडिया गटाकडून मिळवलेल्या खोट्या माहितीचा वापर करून त्यांच्या पत्नीविरोधात निराधार आणि दुर्भावनापूर्ण आरोप केले. हा आसाम निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असून, दंडनीय गुन्हा आहे.
शिवसागर : पवन खेरा यांनी आसाम पोलिसांना अटक करण्याचे आव्हान दिल्यानंतर हैदराबादला पळ काढला, असा दावा हिमंता सरमा यांनी केला. ‘ते का गेले हे मला माहीत नाही, कारण ते (खेरा) काल स्वतःच पळून गेले. कालपर्यंत ते म्हणत होते की, मला अटक करा आणि आता जेव्हा पोलिस त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा ते पळून गेले’, अशी टीका सरमा यांनी केली.
शिवसागर : पवन खेरा यांनी आसाम पोलिसांना अटक करण्याचे आव्हान दिल्यानंतर हैदराबादला पळ काढला, असा दावा हिमंता सरमा यांनी केला. ‘ते का गेले हे मला माहीत नाही, कारण ते (खेरा) काल स्वतःच पळून गेले. कालपर्यंत ते म्हणत होते की, मला अटक करा आणि आता जेव्हा पोलिस त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा ते पळून गेले’, अशी टीका सरमा यांनी केली.







