गुवाहाटी : राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील लढतीला पावसाचा फटका बसला. पावसामुळे लढत केवळ ११ षटकांची झाली. पाऊस थांबल्यानंतर मात्र ‘राजस्थान’च्या यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी धावांची बरसात केली. त्यामुळे ‘राजस्थान’ने ११ षटकांत ३ बाद १५० धावांपर्यंत मजल मारली.
यशस्वी-वैभवने ५ षटकांतच ८० धावांची सलामी दिली. १५ वर्षीय वैभवने १४ चेंडूंत पाच षटकावर व एक चौकारासह ३९ धावा केल्या. यशस्वीने ३२ चेंडूंत १० चौकार व चार षटकारांसह नाबाद ७७ धावा केल्या. यशस्वीने २३ चेंडूंत अर्धशतक ठोकले. हार्दिक पंड्याचा अपवाद वगळता त्याच्या तावडीतून एकही गोलंदाज सुटला नाही. त्याने चौफेर फटकेबाजी केली. यासह जयस्वालची आयपीएलमधील षटकारांची संख्या १०० झाली आहे. संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स - ११ षटकांत ३ बाद १५० (यशस्वी जयस्वाल नाबाद ७७, वैभव सूर्यवंशी ३९, रियान पराग २०, दीपक चहर १-०-२२-०, जसप्रीत बुमराह ३-०-३२-०, बोल्ट १-०-२२-०, हार्दिक पंड्या २-०-१७-०, शार्दूल ठाकूर २-०-३६-१, एम घाझनफर २-०-२१-२) वि. मुंबई (अपूर्ण).

