रायलादेवी तलावाचा संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला असून येथील निसर्गाची अपरिमित हानी झाल्याचे येथे दिसून येत आहे. साचलेला कचरा, कबुतरांसाठी टाकले जाणारे खाद्य यांमुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तलावाच्या पाण्यामध्ये राहणाऱ्या जलचरांनाही त्याचा त्रास होत असून यामुळे येथील जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. तलावातील घाणीमुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होत असल्याने हे ठिकाण नागरिकांसाठी आजारांचे केंद्र ठरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या तलावाच्या स्वच्छता, सुरक्षा यांसाठी प्रशासनाकडून तात्काळ कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरण कार्यकर्ते विजयकुमार कट्टी यांनी व्यक्त केले आहे.

