कोलकाता : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वशर्मा यांनी शनिवारी ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. पश्चिम बंगालची संसाधने ‘बांगलादेशी मुस्लिम घुसखोरांकडे’ वळवल्याचा आरोप त्यांनी केला. ममता यांना सत्तेतून हटवणे गरजेचे आहे; अन्यथा आपण बंगाल गमावू, असेही ते या वेळी म्हणाले.
‘भारतीय जनता पक्षाची घसरण सुरू झाली आहे,’ अशा शब्दांत प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केंद्रातील सत्ताधारी पक्षावर टीका केली. ‘पुढील सार्वत्रिक निवडणुकीपासून महिला लोकप्रतिनिधींना ३३ टक्के आरक्षण लागू व्हावे यासाठी आवश्यक असणारे घटनादुरुस्ती विधेयक केंद्र सरकार लोकसभेत मंजूर करू शकले नाही. यावरून त्यांचे पतन सुरू झाल्याचे दिसते,’ असे त्या म्हणाल्या.
‘या विधेयकाच्या निमित्ताने भाजपचा पराभव झाला आहे. त्यांच्याकडे स्वत:चे बहुमत नाही. केवळ सहकारी पक्षांनी दिलेल्या टेकूच्या आधारे त्यांचे सरकार तग धरून आहे. आम्ही त्यांचा लोकसभेत पराभव केला, त्यांची नाचक्की झाली,’ अशी टीका ममता यांनी केली. ‘महिलांना अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी अशा कायद्याची आम्हाला गरज नाही. आम्ही नेहमीच महिलांना प्रतिनिधित्व देतो,’ असेही त्या म्हणाल्या.








