ठाणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटात चुकीची दृश्ये असल्याचा आरोप करीत या चित्रपटाचा शो बंद पाडून एका प्रेक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड व माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह १२ जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ठाण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अडीच वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला. ठाण्यातील व्हिवियाना मॉलमधील सिनेपोलिस चित्रपटगृहात ७ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ‘हर हर महादेव’चा शो सुरू होता. अचानक ११ वाजता आमदार आव्हाड यांनी जमावासह चित्रपटगृहात धडक देत शो बंद पाडला होता.याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांत आव्हाड यांच्यासह १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.





