बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले थांबलेले नाहीत. फेनी जिल्ह्यात समीरकुमार दास नावाच्या रिक्षाचालकाची मध्यरात्री हत्या झाली. त्यांचा मृतदेह पहाटे सापडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. भाजप नेते अमित मालवीय यांनी या घटनेचा निषेध केला असून अंतरिम सरकारवर टीका केली आहे. अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले थांबताना दिसत नाहीत. फेनी जिल्ह्यात समीरकुमार दास नावाच्या रिक्षाचालकाची रविवारी मध्यरात्री हत्या झाली. फेनीचे पोलीस अधीक्षक शफीकुल इस्लाम यांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरकुमार दास रविवारी रात्री आपल्या ऑटोरिक्षा घेऊन घराबाहेर पडले होते आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले. पहाटे दोनच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपचे नेते अमित मालवीय यांनी या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी बांगलादेशातील अंतरिम सरकारवर जोरदार टीका केली. ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टमध्ये मालवीय यांनी म्हटले आहे की, "ख्रिश्चन आणि बौद्धांसह हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात अंतरिम सरकार अपयशी ठरले आहे."