प्राप्त माहितीनुसार, येथील श्रमिकांना सुरक्षा किट, हातामोजे, हेल्मेट, सेफ्टी चेस्ट प्लेट आदी देण्यात येत नव्हते. जर मोठी घटना घडली तर प्रत्येक कंपनीत अग्निशमन गाडी असणे गरजेचे असते. परंतु, या कंपनीमध्ये त्या सुविधा नसल्याने नेहमीच अश्या घटना घडत असून आतापर्यंत संपूर्ण परिसरातील पन्नासहून अधिक कामगार आपले प्राण गमावून बसले आहेत. कंपनीत छोटी रुग्णवाहिका असून कंपनी टार्गेटसाठी श्रमिकांवर दबाव टाकून काम करून घेते. टार्गेटसाठी जुन्या अनुभवी कामगारांना डावलून नवीन कामगारांनाकडून टार्गेट पूर्ण करण्यात येते. सुरक्षेचा अभाव आणि तंत्रज्ञानातील त्रुटी यामुळेच आमच्या घरातील माणसे गेली, असा संतप्त आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. कष्टकऱ्यांच्या रक्ताने माखलेला हा रविवार कळमेश्वरच्या इतिहासातील काळा दिवस ठरला आहे.
कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती करणाऱ्या कंपनीत रविवारी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या दुर्घटनेत १६ श्रमिकांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे.
हाताला काम मिळेल या आशेने आणि प्रपंचाचा गाडा ओढण्यासाठी जीव मुठीत धरून काम करणाऱ्या या कष्टकऱ्यांचा रविवारी दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे धवलापूर, खेडी आणि परिसरातील अनेक गावांवर शोककळा पसरली असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एसबीएलमधरील भीषण स्फोटाने केवळ जीव घेतले नाहीत, तर अनेक मुलांचे छत्र हिरावले आहे. दुर्घटनेतील काही हृदयद्रावक कहाण्या समाजाच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या आहेत. नरखेड तालुक्यातील खेडी गावातील रहिवासी ज्योत्स्ना मधुकर शेंद्रे (वय ३०) या वर्षभरापासून या कंपनीत कामाला होत्या. पती हातमजुरी करून घराला हातभार लावतात. ज्योत्स्ना यांच्या मृत्यूमुळे खुशी, ईश्वरी या दोन मुली आणि महेश या चिमुकल्या मुलाच्या डोक्यावरचे आईचे छत्र कायमचे हरवले आहे. खेडी गावातीलच सुनीता सुरेश सलामे (वय ३२) यांचाही या स्फोटात अंत झाला. पती शेती करतात. तर होमेश्वरी, आर्या आणि चिकू या तीन मुलींच्या संगोपनाची जबाबदारी सुनीता यांच्यावर होती. त्यांच्या मृत्यूने या तिन्ही मुली पोरक्या झाल्या आहेत. धवलापूर येथील रहिवासी प्रतिभा सुरेश वाळके (वय ३०) या गेल्या दीड वर्षांपासून येथे कार्यरत होत्या. धक्कादायक म्हणजे, त्यांचे पती सुरेश हेदेखील त्याच वेळी शेजारील युनिटमध्ये काम करत होते. डोळ्यादेखत झालेल्या या स्फोटाने त्यांच्या पत्नीचा बळी घेतला. अनिश आणि ऋणाल या दोन मुलांच्या भविष्याचा प्रश्न आता वडिलांसमोर उभा ठाकला आहे.







