क्रॉस वोटिंग आणि घोडेबाजाराची भीती लक्षात घेता आता राजकीय पक्षांनी आपल्या मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘ऑपरेशन बचाव’ सुरू केले आहे. भाजपने आपल्या समर्थक मतदारांना १२ बसेसद्वारे नागपूरला रवाना केले होते. आता काँग्रेसनेही आपल्या ५०हून अधिक मतदारांना थेट शिमला येथे हलविले आहे.
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने १ जून रोजीच आपल्या आणि महायुतीच्या समर्थक मतदारांना १२ बसेसद्वारे नागपूरला रवाना केले होते. आता काँग्रेसनेही आपल्या ५०हून अधिक मतदारांना शिमला येथे सुरक्षित स्थळी पोहोचवले आहे. उर्वरित मतदारांनाही लवकरच जिल्ह्याबाहेर पाठवण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू आहे. हे सर्व मतदार आता थेट १८ जून रोजी मतदानाच्या दिवशीच भंडारा येथे परतणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
मतदारांच्या सुरक्षिततेसोबतच, काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोण असेल, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. १ जून रोजी नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान काँग्रेसकडून दिलीप बनसोड, प्रफुल्ल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर या तिघांनी अर्ज दाखल केले आहेत. तांत्रिक कारणास्तव किंवा अर्ज बाद होण्याची शक्यता लक्षात घेता, पक्षाने रणनीती म्हणून हे तीन अर्ज भरल्याचे मानले जात आहे. गुरुवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल.





