पाऊस लांबल्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला असून, शहरात आज, सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. सम-विषम तारखेनुसार शहरात पाणीपुरवठ्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. पाणीकपातीचा पहिलाच दिवस असल्याने आज, सोमवारी शहरात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुणे महापालिका क्षेत्राला प्रामुख्याने खडकवासला धरणसाखळीतून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पूर्व पुण्याला भामा आसखेड धरणातूनही पाणी पुरवले जाते. यंदा १५ जून उजाडला, तरी शहरात पावसाने हजेरी लावलेली नाही. यंदाच्या वर्षी ‘एल निनो’ सक्रिय असल्याने देशात पर्जन्यमान कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने पूर्वीच स्पष्ट केले आहे. लांबलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना पेरण्या पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. उपलब्ध पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरेल असे नियोजन करण्याच्या सूचना सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.
सध्या महापालिका धरणांतून दररोज सुमारे १६०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलते. कपातीनंतर हा पुरवठा दररोज सुमारे ११०० ते १२०० एमएलडीपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट आहे. सम-विषम तारखेनुसार पाणीकपातीचे वेळापत्रक पालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. भामा-आसखेड प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या उत्तर-पूर्व भागाला तांत्रिक अडचणींमुळे सध्या या कपातीच्या नियोजनातून वगळण्यात आले आहे.
कारवाईचा इशारा
पाणीटंचाईचा गैरफायदा घेऊन नागरिकांची अडवणूक किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या टँकरचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




